चीन रोखणार ब्रह्मपुत्रेचे पाणी?   

संकेत कुलकर्णी

भारतातील ब्रह्मपुत्र नदी तिबेटमध्ये यारलुंग त्सांगपो नावाच्या प्रवाहाच्या रूपात वाहते. याच ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी चीन भारतासाठी रोखू शकतो का? भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानने चीनसमोर त्सांगपो म्हणजेच ब्रह्मपुत्र नदीचे पाणी रोखण्याची कल्पना मांडली आहे.
 
ब्रह्मपुत्रासारख्या उच्च गाळाच्या नदीचा प्रवाह वळवणे केवळ पाण्याबद्दल नाही, तर त्याचा परिणाम मातीच्या निर्मितीवरही होईल. जर भारताने पाकिस्तानात वाहणार्‍या नद्यांचा प्रवाह रोखण्यासाठी काही केले तर चीनही तेच भारताच्या बाबतीत करू शकतो, असे पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे वरिष्ठ सहायक राणा एहसान अफझल यांनी सांगितले.
 
भारत-चीन सीमेजवळील ग्रेट बेंड येथे यारलुंग त्सांगपोवर चीन ६० हजार मेगावॅट क्षमतेचा मेडोंग धरण बांधत असल्याने त्यांच्या वक्तव्यामुळे काही चिंता निर्माण झाली. मात्र, चीनकडून पाणी अडवण्याची किंवा वळवण्याची कोणतीही शक्यता तज्ज्ञांनी फेटाळून लावली आहे. कारण सर्वात मोठी चिंता अशी आहे, की जगातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेले हे धरण चीनच्या नियंत्रणाखाली असलेल्या तिबेटच्या आपत्तीग्रस्त भागात बांधले जात आहे.
 
दोन दशकांपासून ब्रह्मपुत्र नदीच्या प्रणालीचा अभ्यास करणारे अर्थशास्त्रज्ञ निलांजन घोष म्हणाले, चीनने ब्रह्मपुत्रेचा प्रवाह रोखण्यासाठी कधीही कोणताही दृष्टिकोन स्वीकारला नाही, जरी ते या नदीवर धरण बांधत असतील, तर त्यांच्यासाठी या नदीचा प्रवाह वळवण्याचा कोणताही प्रयत्न अयोग्य ठरेल. कारण यामुळे गाळ साचेल आणि त्यांच्याच भागात पूर येईल, असे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन येथील विकास अभ्यासाचे उपाध्यक्ष घोष यांनी सांगितले.
 
ब्रह्मपुत्रेला प्रामुख्याने पाऊस आणि उपनद्यांनी पाणीपुरवठा केला जातो आणि ब्रह्मपुत्रेच्या एकूण पाण्याच्या प्रमाणापैकी यारलुंग त्सांगपो नदीचे योगदान फक्त १० ते १५ टक्के आहे, त्यामुळे चीन याचे पाणी रोखू शकणार नाही. ब्रह्मपुत्रा नदी जसजशी खाली येत जाते तसतसे तिचा प्रवाह जास्त मोठा होते, असे घोष यांनी नमूद केले.

पाणी रोखणे अशक्य

या वर्षी जानेवारीमध्ये, घोष आणि त्यांचे सहकारी संशोधक सायनंगशु मोडक यांनी पीअर-रिव्ह्यू केलेल्या इंटरनॅशनल जर्नल ऑफ वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंटमध्ये एक संशोधन पत्र प्रकाशित केले. ज्यामध्ये त्यांनी ब्रह्मपुत्रेचे पाणी  चीन रोखेल या दाव्याचे खंडन करण्यासाठी जलविज्ञानविषयक डेटाचा वापर केला. गेल्या काही वर्षांत गोळा केलेल्या माहितीवरून असे दिसून येते, की तिबेटमधील नुक्सिया येथे मोजण्यात येणारा यारलुंग त्सांगपो नदीचा विसर्ग दरवर्षी ३१.२ अब्ज घनमीटर (बीसीएम) आहे, जो ग्रेट बेंडमधून जाताना आणि चीनमधून बाहेर पडताना अंदाजे ७८.१ बीसीएमपर्यंत वाढतो. गुवाहाटीतील पांडू येथील गेजिंग स्टेशनवर ब्रह्मपुत्रेचा वार्षिक विसर्ग ५२६ बीसीएम आहे, जो सहा पटीने वाढ दर्शवितो. भारताच्या सीमेपलीकडे असलेल्या बांगलादेशातील बहादुराबाद येथे वार्षिक विसर्ग ६०६ बीसीएम आहे. यावरून असे दिसून येते की ब्रह्मपुत्रा नदी भारतात प्रवेश केल्यानंतर तिच्या उपनद्यांमुळे तिच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

ब्रह्मपुत्रेतील पूर काय दर्शवतो?

पश्चिम तिबेटमधील अंग्सी हिमनदीपासून उगम पावणारी, यारलुंग त्सांगपो चीनच्या नियंत्रणाखालील तिबेट प्रदेशातून एक हजार ६२५ किलोमीटर प्रवास करते आणि नामचा बारवा शिखराजवळील ग्रेट बेंडनंतर भारतात प्रवेश करते. नंतर, ब्रह्मपुत्रा म्हणून, ती भारतात ९१८ किलोमीटर आणि बांगलादेशात ३३७ किलोमीटर वाहते, जिथे तिला जमुना म्हणतात, आणि बंगालच्या उपसागरात येते. तिबेटमधील त्सांगपो-ब्रह्मपुत्र प्रणालीची लांबी पाहून असे वाटते की ती चीनमधील पाण्याची एक प्रमुख नदी आहे.      

...तरीही भारतावर परिणाम होणार नाही

घोष हे हिमंता बिस्वा सरमा यांच्या ब्रह्मपुत्रेच्या विश्लेषणाशी सहमत आहेत, परंतु त्यांचा अंदाज आहे, की सांगपो नदीचे ब्रह्मपुत्रेला मिळणारे पाणी आसामच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या ३० ते ३५ टक्क्यांपेक्षा खूपच कमी आहे. जरी या नदीची प्रणाली चीनमध्ये तिच्या प्रवाहाच्या ५६ टक्के भाग पूर्ण करते, तरी तिच्या सीमेत तिचे पाणी फक्त १५ टक्के आहे. म्हणूनच काही साहित्यात यारलुंग त्सांगपोला ब्रह्मपुत्रेची उपनदी म्हणून संबोधले जाते, घोष यांनी सांगितले. असे मानले जाते, की ब्रह्मपुत्रा नदी प्रत्यक्षात पूर्व आसाममधील सादिया येथे दिहांग (सियांग), लोहित आणि दिबांग या तीन नद्यांच्या संगमावर तयार होते. म्हणून, यातील जलशास्त्रीय तथ्ये पाहता, चीनने त्सांगपो नदीचा प्रवाह रोखला तरीही भारतावर कोणताही मोठा परिणाम होणार नाही, असे घोष यांनी स्पष्ट केले.

Related Articles